एक महत्वाचं कौतूक

एक महत्वाचं कौतूक
.
गेले अडीच ते तीन महीने निवडणूकीची धांदल आपण पाहिली. एक्क्याण्णव कोटी मतदार, पाचशे बेचाळीस जागा, वीस हजाराच्या जवळपास उमेदवार, सात फेऱ्‍या आणि जगातली सर्वात मोठी लोकशाही...
.
भारतात लोकशाही टिकवणं सोप्पं नाही.
इथे दर तीन लोकांमागे एक जण द्वाड आहे, एक जण उपद्व्यापी आहे. एक जण दिडशहाणा आहे. भौगोलिक परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. राज्याराज्यात लोकल गावगुंड आहेत. भाषा, प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. आणि त्यातही मे चं कडक ऊन.
भरीस भर म्हणजे कंट्रोल न ठेवता येणारं सोशल मिडीया.
.
तरीही भारतीय लोकशाहीचा प्रचंड विजय झाला... पक्षाचा विचार बाजूला ठेवा. लोकशाहीने सतरावी लोकसभा देशाला दिलीय.... आचारसंहीता पाळून. पवित्रपणे, प्रामाणिकपणे...!
.
तीन महिन्याच्या प्रचारात प्रचंड धुराळा उडाला. इव्हीएमवर आरोप झाले. एकमेकांवर चिखलफेक झाली, हाणामाऱ्‍या झाल्या, पण शेवटी सगळ्या गोष्टी नियंत्रणाखाली होत्या... मोदीँपासून राहुलपर्यँत सगळ्यांवर या यंत्रणेची घट्ट पकड होती... ती यंत्रणा म्हणजे "भारतीय निवडणूक आयोग"...
आज मोदी किँवा राहूल जिँकले नाही, तर भक्कमपणे हा लोकन्नाथाचा रथ ओढून संसदेच्या मंदिरात यशस्वीपणे आणल्याने निवडणूक आयोग जिँकलंय...!
.
निवडणूक आयोगाचे कर्मचारी, निवडणूकीच्या ड्यूटीवरचे सरकारी कर्मचारी, अखंड संरक्षण देणारं पोलीस दल, सैन्य, इव्हीएम वाहतूक करणारे एस टी कर्मचारी, अधिकृत मिडीया, तंत्रज्ञ, निकालाची प्रक्रीया राबवणारे आधिकारी, आचारसंहीता भंग होणार नाही यावर नियंत्रण ठेवणारा कक्ष इत्यादी कर्मचाऱ्‍यांमूळेच १७ वी लोकसभा दिमाखात सत्तारुढ होईल.
.
लोकशाहीच्या १७ व्या महोत्सवाची सांगता या हजारो हातांच्या कष्टाच्या कौतूकाशिवाय अपुर्ण आहे.
.
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved