फसलेला डाव सुटलेला पेच
११ नोव्हेंबरला संध्याकाळी साडे सात वाजता शिवसेनेचा दावा काँग्रेसने मोडीत काढला त्याच्या नंतर काही मिनिटांतच मी पोस्ट टाकली होती.. "फार मोठा गेम होणार आहे." मला सारखे वाटत होते की युतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे नक्की झाल्यावर महाआघाडीचे किंवा भाजप राष्ट्रवादी अशी दोनच कॉम्बिनेशन्स पॉसीबील आहेत. महाआघाडीचे प्रचंड घोळ सुरू होते. पण २२ नोव्हेंबरला रात्री बहुतेक सर्व मुद्दे निकालात निघाले असे चित्र निर्माण झाले होते. त्याच रात्री उशीरा भाजपने खेळी केली. हा डाव डेंजरस होता कारण तो अजित पवार यांच्या भरवशावर होता.त्यांची मलिन प्रतिमा आहे तरीसुद्धा भाजपने हा डाव रचला.पण याहून अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो संख्येवर अवलंबूनच नव्हता तर कायद्याच्या कक्षेत पण पळवाट शोधून खेळलेला होता. याबद्दल मी अंदाज व्यक्त केला होता तो खरा ठरला. भाजपने हे का केले असावे ? राजकारण आपल्याला वाटते तसेच केले जावे ही अपेक्षा धरणे मुळातच चूक आहे. तिथे वेळ पडली तर अशक्य वाटणारे निर्णय घेतले जातात. कट्टर समर्थक नाराज होतील हे माहिती असूनही घेतले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे राजकारण सत्तेसाठी केले जाते.