3 Years Of Modi Government

■ #मोदी_सरकारची_3_वर्षे

मोदी सरकारला आज 3 वर्षे पूर्ण झाली. काही गोष्टी मला दिसतायत काही दिसत नाहीत. पण मी समाधानी आहे कारण गेल्या तीन वर्षात -

> मला रेल्वेत, बेकरीत, हॉटेलात बॉम्ब फुटताना दिसत नाहीयेत.पुण्यात-मुंबईत-हैदराबाद-बंगलोरमध्ये मला अतिरेकी घुसलेले दिसत नाहीत. मला आतंकवादी लोक गोळ्या घालून मारलेले दिसत आहेत. मला सीमेपालिकडे घुसून मारण्याची कारवाई केलेली दिसतेय. मला हे करताना लांगुलचालन सोडून थेट अप्रोच बाळगलेला दिसतोय. मला आतन्कवाद्यांवर घेतली जाणारी उघड भूमिका दिसतेय.

> मला हजारो लाखो कोटींचे घोटाळे उघडकीस आलेले दिसत नाहीयेत. आरोप-प्रत्यारोप आपल्या जागी पण कोर्टात चार्जशीट दाखल झाली असा एकही भ्रष्टाचाराचा घोटाळा मला दिसत नाहीये. आधी मला दर दोन महिन्यातून एकदा भ्रष्टाचाराची ब्रेकिंग न्यूज दिसत असे, आताही क्वचित दिसते पण ती देखील ह्या सरकारची नव्हे.

> मला रस्ते-हायवे डोळ्यासमोर पूर्ण होताना दिसत आहेत. 2004-2014 काळात क्वचित कुठेतरी रस्त्याचे खड्डे भरण्याचे काम दिसे, मुंबई-हैदराबाद हा हायवे गेल्या तीन वर्षात सोलापूर-हैदराबाद ह्या दरम्यान पूर्ण ट्रान्सफॉर्म झालेला मला दिसतोय. शिवाय अनेक नवीन रस्ते दिसत आहेत. मला भरपूर नवनवीन प्रोजेक्ट दिसत आहेत. मला ह्याबाबतीतलं व्हिजन दिसतंय.

> मला रेल्वेत अमुलाग्र बदल दिसतोय. मे 2014च्या आधी कुठल्याही डब्यात(राजधानी-दूरंतो-शताब्दी सोडून) फिनेल टाकून साफसफाई, मेसेज टाकून सफाई कामगाराला बोलावण्याची सुविधा, IRCTCवर शून्य मानतात बुकिंग, स्टेशनवर हायस्पीड वायफाय वगैरे पाहिलं नव्हतं. बंगलोर-सिकंदराबाद इत्यादी स्टेशन सोडल्यास बाकी स्टेशन कचराकुंडी असायचे. आता बऱ्यापैकी स्वच्छ असतात. आधीचे रेल्वे मंत्रालय प्रवाशांना दाद देताना दिसायचे नाही, आता स्वतः रेल्वे मंत्री लोकांना प्रतिसाद देताना पाहतोय. मी आधी तात्काळ तिकीट काढायला पहाटे 3 वाजल्यापासून लायनीत उभा राहत असे, एजंट लोकांना अव्वाच्या सव्वा पैसे देत असे, आता मी बसल्याजागी मिनीटभरात तिकीट काढतो. कंपार्टमेंट स्वच्छ नसेल तर एक sms टाकून पुढच्या स्टेशनवर स्वच्छ करून घेतो. माझ्या तक्रारींची दखल घेतली जाते!

> मी अनेक गाव-खेड्यात वीज पोचताना पाहतोय. मी ऊर्जा मंत्र्यांना लोकांना प्रतिसाद देताना पाहतोय. वेळेत काम पूर्ण करून लोकांसोमर उघडपणे मांडताना पाहतोय.

> मी विदेशमंत्र्यांचे काम पाहतोय. विदेशात अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या जमेल तितक्या स्वतः सोडवताना पाहतोय. विदेशात संकटात सापडलेल्या लोकांसाठी विदेशमंत्रालयाला पूर्ण जोर लावताना पाहतोय. पूर्वी लोकांना थेट मंत्र्यांशी बोलताना पाहिलं नव्हतं. आता मला ते दिसतंय! 

> मला विदेशातील लोक भारताकडे सकारात्मक दृष्टीने पाहताना दिसत आहेत. अनिवासी भारतीय असोत की गाव खेड्यातला मनुष्य असो आज सकारात्मक राजकारणाला घेऊन जास्त जागरूक झालेला दिसतोय.

> मी ह्यापूर्वी नेते, पत्रकार-बुद्धिवादी लोकांना प्रधानमंत्र्यांना थेट शिवीगाळ करताना पाहिलं नव्हतं. ते ही पाहतोय, तरीही त्यांना कसलाही त्रास होत नाही म्हणजे आणीबाणी अली नाहीये हे मला दिसतंय. ह्याच बुद्धिवाद्यांनी मला आणीबाणी येईल, दंगे होतील, अल्पसंख्यांकाना त्रास होईल म्हणून भीती घातली होती. मला ह्या गोष्टी फारश्या दिसून येत नाहीयेत.

> मला आजकाल ह्या सरकारच्या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली पेटलेल्या दिसत नाहीत. तसेच मुस्लिम देखील स्वतःच्या मतांवर ठामपणे-उघडपणे टीव्हीवर, पेपरमधून, सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात त्यामुळे ते दबावाखाली किंवा घाबरलेले दिसत नाहीत.

> मला मतपेटीसाठी केलेलं लांगुलचालन दिसत नाहीये. मला तीन तलाकसारख्या मुद्द्यांवर स्टॅण्ड घेणारं सरकार दिसतंय. मला हिंदू-मुस्लिम भेदभाव दिसत नाहीये.

> मला जलयुक्त शिवार दिसतंय, आक्रमकरित्या राबवलं जाणारं स्वच्छता अभियान दिसतंय, लोकांना बँकेशी जोडलं जाणं दिसतंय. मला गरिबांच्या घरात गॅस सिलिंडर पोचताना दिसतंय. मला माझ्या तहानलेल्या गावात रेल्वेने पाणी दिलेलं दिसतंय. मला गावोगाव शौचालय बांधण्याची आक्रमक मोहीम दिसतेय, मला सर्व शाळांमध्ये मुलींमसाठी स्वच्छतागृहे दिसतायत. मला प्रगतीसाठीचे प्रामाणिक प्रयत्न दिसतायत.

मला अजूनही बऱ्याच चांगल्या गोष्टी दिसतायत. मी अजून आशावादी आहे. योग्य सरकार निवडल्याबद्दल समाधानी आहे.

सोबतच...

गोमांस बंदी, गौरक्षा इत्यादी मुद्द्यांवर मात्र मला सरकारचे निर्णय आणि अप्रोच रुचले नाहीत. ह्या आशा गोष्टींना माझा कदापि पाठिंबा असणार नाही.  आशा आहे की सरकार ह्यांची दखल घेऊन योग्य तो निर्णय घेईल.

मला नोटबंदीत लोकांना झालेला त्रास देखील दिसला, शेतकऱ्यांच्या अडचणी दिसल्या, ह्यावरून सरकार धडा घेईल आणि पुढच्या निर्णयात व्यवस्थित अंमलबजावणी करेल अशी आशा. हिंसक गौरक्षकांच्या टोळ्यांना देखील सरकारने पकडून कठोर कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे.

अनेक गोष्टीत अजून हे सरकार अपयशी आहे पण त्यापेक्षा सरकार बऱ्याच गोष्टीत यशस्वी आहे, प्रामाणिक आहे, काम करण्याची इच्छा बाळगून आहे! पुढची 7 वर्षे ह्या सरकारने चुकीच्या गोष्टी सुधारून चांगली कामे करत राहावीत अशी अपेक्षा.

(हे सर्व माझ्याबाबतीत आहे. तुमची धारणा वेगळी असू शकते. त्याचा सन्मान आहेच.)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved