Yogi Aditynath

योगी आदित्त्यनाथ उ.प्र.चे मुख्यमंत्री झाले ! भारताचे हिंदुराष्ट्रपणाबाबत आता कुणाचे मनात काही शंका राहू नयेत. फार स्पष्ट संदेश आहे हा ! आता शपथसोहळा वगैरे औपचारिकता तेवढ्या पार पडायच्या आहेत.
योगी आदित्त्यनाथ हे जहाल हिंदुत्त्ववादी समजले जातात. यांची तुलना ब्रह्मदेशातील ( मिन्यामार) इस्लामविरोधी जहाल बौद्ध महंत विरथु यांचेशी होऊ शकेल, या विरथुंनी ब्रह्मदेशातील मुस्लीमांविरोधात शस्त्र उचलले होते. जगात बौद्ध तत्त्वज्ञान शांततेचे म्हणून ओळखले जाते. परंतु, ब्रह्मदेशात बौद्ध भिख्खूंनीच तिथल्या मुसलमानांविरोधात शस्त्र हाती घेतले होते. आदित्त्यनाथांची तशी ख्याती नाही. परंतु, जहाल वक्तव्यांची आहे. पूर्व उ.प्र. मध्ये त्यांचे नावाचा महाराष्ट्रातील शिवसेनाप्रमुख कै बाळासाहेब ठाकरे यांचेप्रोा दरारा आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेने भाजपबरोबरचे सगळे वैर बाजूला ठेवून योगी आदित्त्यनाथांचे निवडीचे उत्स्फूर्त मनपूर्वक स्वागत केलेले आहे. उ.प्र.तील सगळ्या हिंदू-मुस्लीम दंगली या पश्चिम भागात झालेल्या आहेत. जिकडे मायावती आणि यादवांचा प्रभाव होता ! (आता सगळा उ.प्र. भाजपचा आहे). आदित्त्यनाथांचे पूर्व उ.प्र.त नाही. मला खात्री आहे की यापुढे उ.प्र. त दंगली होणार नाहीत. आणि झाल्याच तर ? २००२ चे गोध्रा दंगलीनंतर गुजरातेत १५ वर्षे एकही हिंदू-मुस्लीम दंगल झाली नाही, हा आपला अनुभव आहे.
योगी म्हटला जाणारा संन्यासी हा उ.प्र.सारख्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री ही जगाचे इतिहासातली कदाचित पहिली घटना असेल. (भाजपच्याच  स्त्रीमहंत उमा भारती मात्र मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या ). योगी, महंत, बुवा, साध्वी त्यांचे, त्यांचे मठात, संप्रदायात सर्वोच्च असतात. पण देशाचे राजकीय सत्तेत त्यांची भागीदारी मला वाटते की विश्व हिंदु परिषदेचे स्थापनेनंतर, त्यांचे प्रयत्नांनी चालू झाली. जनतेतून निवडणुकांना उभे राहून, किंवा राज्यसभेतून ही मंडळी भगवे कपडे धारण करून निवडून येऊ लागली. तसा संन्याशांचे आधुनिकीकरणाला आरंभ विवेकानंदानी केला असे म्हणता येऊ शकेल. त्यांनी समुद्र-उल्लंघन करून अेक सनातनी हिंदू पायंडा मोडला. शिकागोला इंग्रजीत भाषण केले. तिथे आधुनिकता सुरू झाली. ती आता संन्याशाने मुख्यमंत्री होईपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सध्याचे बरेचसे हिंदू महंत-महंतिणी हे उच्चशिक्षित, उत्तम इंग्रजी जाणणारे आहेत. आधुनिक चलभाष, संगणक ही साधने वापरणेत वाकबगार आहेत.
योगी आदित्त्यनाथांचे रूपाने भारतात एक नवे पर्व सुरू होते आहे. या धाडसाबद्दल, प्रयोगशीलतेबद्दल मोदी शासनाचे, भाजप पक्षाचे आणि त्यामागील रा.स्व.संघ आणि त्याचे संपूर्ण परिवाराचे अभिनंदन.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved